
हिंगोली, दि. १९ (जिमाका): आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुंडा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गरुड यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील शिवतांडव मित्र मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात आज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ. गरुड यांनी आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो. पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळतात, आदी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्काची ठिकाणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवतांडव मित्र मंडळाचे अभिमन्यू चव्हाण, आदिनाथ चव्हाण, कृष्णा चव्हाण, सतीश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आणि तुकाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.
०००

Leave a Reply