थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दि. १७ (जिमाका):  देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर व परिसरातील मंदिरांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर भर देणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पालकमंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती मालतीबाई पैठणकर,  आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्र काबंळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद ही संस्थाने विलीन झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता. सतत 13 महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला. या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 78 वा वर्धापन दिन मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. याबाबत त्यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय पोषण माह-२०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून पोषण, मातृ-बाल आरोग्य, स्वच्छता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. याबाबत पालकमंत्री झिरवाळ यांनी कौतुक केले.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 13 हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, आजअखेर जिल्ह्यात झिरो पेंडन्सी आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ही कार्यवाही दक्षतेने सुरू असल्याची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी दिली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 1 हजार 343 लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत 96 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 12 कोटी 43 लाख रुपये व्याज परतावा डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 साठी पीक कापणी प्रयोगांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात मूग व उडिद पिकांचे पीक कापणी प्रयोग प्रशासकीय पातळीवर सुरू असून, सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग सप्टेंबरअखेर सुरू करण्यात येणार आहेत. DCS MH ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून पीक नोंदणी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद होणार असून, शासकीय योजना, अनुदान व विविध सेवांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री झिरवाळ यांनी केले.

पांगरा शिंदे येथे राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित

जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद व वैज्ञानिक अभ्यासासाठी पांगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे भूकंपाची माहिती रिअल टाइममध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडे पाठविली जाणार असून, केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 42 हजार 612 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण झाली असून, उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसह ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ३ कोटी २० लाखांची रक्कम वितरित

हिंगोली जिल्ह्यात एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरणाची योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील ३४ हजार ९३४ एपीएल शिधापत्रिकाधारकांपैकी १७ हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर आतापर्यंत ३ कोटी २० लाख ३७ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना रक्कम मिळावी, यासाठी कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मृतीस्तंभास सलामी देवून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ध्वजारोहनानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत गायले. पंडीत अवचार यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, चिंचोली ता.जि.हिंगोली येथील शाळेचे विद्यार्थी अनिकेत गणेश उचितकर यांचा एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे निवड झाल्याबाबत सन्मान करण्यात आला.

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टुलकिट वाटप व कर्ज मंजूरी पत्राचे वाटप पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील आकाश हनवते, स्वाती विजय लाटे, प्रिंयका बबन डाकोरे, दत्तराव माधव हनवते, रामा दगडु बलखंडे यांचा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *