
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : वसमत तालुक्यात पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज वसमत तालुक्यातील आसेगाव, टाकळगाव आणि बोराळा येथील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनय आवटे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे उपनगराध्यक्ष राजकुमार एगडे, पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
टाकळगाव, आसेगाव, बोराळा परिसरातील शेती पिकांची पाहणी करताना कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, पावसाची परिस्थिती तसेच विविध अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, सुकलेली पिके, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली. या गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास शेतकरी बांधवांना दिला.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.
अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा- मंत्री दत्तात्रय भरणे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी ट्रिगर लागू झालेले आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश आहे. वसमत तालुक्याचा या दुष्काळी यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशी पोस्ट विविध समाज माध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत आहे. याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी सदर पोस्ट ही बनावट असून यामध्ये कोणतीही सत्यता नाही. शासनामार्फत अशा प्रकारची कोणतीही यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये, केवळ शासनामार्फत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन यावेळी केले.
००००

Leave a Reply