
रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): समाज कल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज नूतनीकरणाची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. विहित मुदतीत अर्जाचे नूतनीकरण न केल्यास संबंधित विद्यार्थी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरू शकतो. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज नूतनीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण शीतल सोनटक्के यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org वर ऑनलाइन पद्धतीने अर्जाचे नूतनीकरण करता येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन पोर्टलवर अर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अर्ज नूतनीकरण करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती अचूकपणे भरून अर्ज अंतिमरित्या सादर करावा. अंतिम मुदतीनंतर अर्जामध्ये कोणताही बदल अथवा दुरुस्ती करता येणार नाही.
अर्ज नूतनीकरण करताना तांत्रिक अडचण किंवा समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा.
०००००

Leave a Reply