थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानाला लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून प्रारंभ

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानाला लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून प्रारंभ

लातूर, दि. १७ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमात कृषि विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. यामाध्यमातून मळणी यंत्रे, तेल घाणे यासारख्या शेतीशी निगडित छोटे छोटे उद्योगांसह इतरही व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. यासाठी १ कोटी रुपयेपर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येते, तर १७ लाख ५० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घेवून गावात छोटे छोटे उद्योग उभारावेत, असे आवाहन जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी केले. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मधाचे गाव या योजनांची माहिती दिली.

कृषी अधिकारी सुनील घारोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कृषी विभागाच्या सर्व योजना डिजिटल स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाकृषी विस्तार एआय ऍप विकसित करण्यात आले आहे. हवामान, बाजारभाव, पिकांवर येणाऱ्या किडीवर कोणत्या फवारण्या करायच्या, याबाबत माहिती या ऍपवर दिली आहे. व्हिडीओ स्वरूपातही ही माहिती दिली आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप डाउनलोड करावे. याच प्रमाणे रासायनिक खतांची घरबसल्या नोंदणी करण्यासाठी एफएफएस ऍप सुरू केले आहे.

महाडीबीटीच्या माध्यमातून विविध लाभांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्वतः यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया होत आहे, असे श्री. घारोळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेततळे, फळबाग लागवड आदी योजनांची माहिती दिली.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *